परीक्षा कुणाची ? विद्यार्थ्यांची, पालकांची, कि शिक्षकांची ?

                                                      सध्याच्या परीक्षेच्या आणि शिक्षण व्यवस्थेच्या विश्वात सचेतनत्व राखून निरंतरता ठेवण्याचं कार्य हे पालक-विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडेच आहे. बाकीच्या कोणत्याही संबंधित गोष्टी असतील तर त्या या तिघांच्या उपविभागातल्या ठरतात. असं मला वाटतं. पण, मूळ उगमस्थान मात्र कृतिरित्या वरील तिघांकडूनच घडायला हवं. त्याला अनुसरून शिक्षण व्यवस्था ठरवली तर उत्तम ' शिक्षणपीठ ' व्हायला अवधी लागणार नाही.
                           आपण नमूद केलेल्या प्रश्नांविषयी सांगायचं म्हंटल तर, ' नापास ' या शब्दाची धारणाच मुळात भीतीच निर्मितीकेंद्र आहे. पूर्वीच्या ' दडपणापेक्षा ' आताच्या युगातल्या ' एकटेपणामुळे ' त्या शब्दातून एक भयानक धास्तीच सतत आसपास वावरत असल्याचं दिसून येतय. मग त्यावर उपाय म्हणून बेकायदेशीर पावलंही टाकली जातात हेही काही कमी नाहीये. त्यामुळे ' नापास ' या शब्दाऐवजी किती गुणांनी विद्यार्थी कमी पडला हे लक्षात घ्यायला हवंय. भीतीही मग उरणार नाही; आणि जोपर्यंत क्षमतांची मर्यादा प्राप्त होत नाही तोपर्यंत मर्यादित प्रयत्नांतून त्या विद्यार्थ्याला त्याच्या इप्सिताप्रत पोहचवलं जावं. हे कार्य शिक्षक आणि पालक यांच्याकडून शिक्षण व्यवस्थेच्या अधिपत्याखाली जाऊन किंवा व्यक्तिगत राबवलं जावं. पण, याच सोबत विद्यार्थ्याला त्याच्या प्रगती आलेखानुसार संवेदन आणि योग्य ती समजशील जाणीव करून देणंही महत्वाचं आहे. हि अशा प्रकारची प्रणाली असेल तर ' शिक्षकांना सोप्प उत्तर हवंय ' असा अर्थ यातून निघणार नाही. केवळ न्यूनत्वाची जाणीव आणि अपूर्णतेला परिपूर्ण करण्याविषयी घेतली जाणारी काळजी याकडे लक्ष द्यायला फार तर ' नापास ' हा शब्द उचित ठरतो. पण, शेवटी विद्यार्थीच एकटा नाही का पडणार ? त्यामुळे हि जबाबदारी पालक आणि शिक्षक यांनी आत्मसात करून ती पेलायला हवी. 
                             दुसरा मुद्दा असा कि, परीक्षेमध्ये केवळ निवडक प्रश्नांनाच प्राधान्य दिलं जातं. तर असं न करता संपूर्ण पाठयपुस्तकाचा परामर्श घेणारे प्रश्न लहान-लहान गुणांमध्ये विभागले गेले तर आकलनात्मक ज्ञान सदैव आत्मविश्वास देत राहील भीतीही उरणार नाही. हे असेल कि ते ? अशीहि होणार नाही. पण आजकाल निवडक प्रश्न म्हणजे जणू काय ' सेलिब्रेटी ' असल्यासारखे झालेत. परीक्षा केवळ पात्र/अपात्र ठरवते तर ज्ञान उपरोक्त कृतीनंतर आयुष्यभरासाठी पात्र/अपात्र ठरवते.  यालाच खरं तर जडणघडण म्हंटल तर नाही का चालणार ? तंत्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर, तंत्र हे काही केवळ परीक्षेतच असत नाही. अगदी सर्वच बाबतीत तंत्र वापरलं जातं. त्यातून कौशल्याला वाव मिळणार असतो. ज्ञान असल्याशिवाय विद्यार्थीच काय तर कुणीही स्पष्टीकरण आणि मांडणी करू शकत नाही. तसच बाजारात यशाची पुस्तक आणि स्मरणशक्तीची औषध यांसारख्या गोष्टीही उपलब्धता दाखवितात. पण, न्यूनत्वाची योग्य नस पकडण्याच उद्दिष्ठ ठवून केवळ उपायात्मक म्हणून ते न्यूनत्व भरून काढण्यासाठी त्या गोष्टी या जगात वावरत असतात. हाही मग ज्याच्या -त्याच्या धारणेचा प्रश्न आहे. परमेश्वराला ४ फुलं वाहिली काय आणि ८ वाहिली काय, आपलं आयुष्य चांगलं ठेवून जोपर्यंत स्वतःलाच स्वतःची ओळख होत नाही तोपर्यंत वाहण्याची धारणा, भावना श्रद्धेला धरून घडतच जाते. पुन्हा यशस्वी-अयशस्वी ठरल्यानंतरही कृतघ्नता म्हणून शेवट् प्रत ती सोबत राहतेच. असो. 
                                      तिसरा मुद्दा असा कि, शाळा ,शिकवणी, गृहपाठ यांसारख्या गोष्टी असूनही परिणाम दिसत नाही कारण, शाळेत, शिकवणीत आणि घरात किंवा एकांतात त्या विद्यार्थ्यांच्या सानिध्याला आणि मनोवस्थेला जाणून घ्यायला हवंय. नक्कीच मुळाशी जाऊन योग्य परिणाम दिसून येतील. गुणवत्ता सुधारण्यापेक्षा ' ज्ञानवत्ता ' आलेख कुठवर आणि किती झालाय याकडे लक्ष दिल्यास गरज ज्ञानाच्या पूर्ततेसाठी ज्ञानमूर्त्यांचं दर्शन रांग न लावता होत राहील.
                                      चौथा मुद्दा असा कि, पूर्वी कुणी मागे पडत न्हवतं . नापासाची पद्धत असूनही छानपैकी शिकता यायचं याचं कारण असं.कि, पूर्वी स्पर्धा, चढाओढ नसायची. पण, आता मात्र माझं-माझं  ' स्टेटस ' ,वरचढ पणा, सर्वश्रेष्ठपणा यांनी मानवी आयुष्यच अवघ व्यापलेलं आहे. गरज,वेळ,पैसा आणि नाती या चार गोष्टींना पाहून हव्यासाचा अट्टहास संतुलित व्हायला हवा.
                                        पाचवा मुद्दा असा कि, शिक्षक आणि पालक यांनी सूचना आणि शिकवण यासोबतच कटिबद्धतेच मार्गदर्शन करण्याचा मार्ग अंगिकारला तर विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यात एक छानपैकी मैफिल किंवा चर्चासत्र घडेल कारण वारसा-पिढी हे सर्व सतत पुढेच जाणारं असत. यातूनच शाश्वत , पारंपरिक मूल्यांसोबत आधुनिकतेशी मेळ घालून बौद्धिक-मानसिक-शारीरिक विकासगती प्राप्त होईल. अनुभवाचं आणि प्रबोधनाचं वेचणं असल्यामुळे प्रगतिशील राहण्याचं सामर्थ्य नेहमी आणि सदैव अविरतपणे कार्यरत राहील.यासाठी प्रत्यक्ष कृती महत्वाची ठरेल. नाही का ? निसर्गाचे प्रहर तर अखंड विश्वावर चालूच असतात. त्यांचं ज्ञान हे शेवटी आवश्यकतेनुसार ग्रहण करणं हे आपल्या मानवावरच अवलंबून आहे. 
धन्यवाद ! 

                                                                                                          अनमोल सुतार. ( कवी अन्नू )
                                                                                                           शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.


                                                                                                        
© सकाळ-सप्तरंग अभिप्राय . ०८ नोव्हेंबर २०१६. १२:३२

Comments

Popular posts from this blog

जागतिक स्वच्छता दिन २ ० २ ५ .

'द व्हिलन' - 'तो' ही आणि 'ती' ही.

अंधार जेव्हा होई प्रकाशाचा वैरी